सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबड धोबड दिसत होते. त्या आक्राळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षात होता.
वारा मंद वाहत होता.त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली ती पन्नास झोपडी भेदरलेली होती. जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला नि त्या घरातमानसं राहात होती. बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर च्या धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली मानसं आता तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता पोर खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता.त्याच्या हृदयात बायंकर हुरहूर उठली होती.त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती.त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता. भीमा पुनः पुनः सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता.त्याला आता अंधाराची गरज होती.म्हणून तो चुळबुळत होता.त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापीत होती. हा भीमा अंगापिंडान जबरा होता. तो भर पहिलवाना सारखा दिसे. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हूडहुडीच भरत असे.
भीमाच गाव दूर वारणेच्या काठी होत. पण रेड्याच बळ असूनही पोट भरत नाही. म्हणून तो मुंबईला आला होता.मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती.पण त्याला काम मिळालं नव्हतं. आपणाला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्यांची माळ करावी, अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात, जंगलात आला होता.मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत.यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगरा जवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होत.
त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता.तो आपलं रेड्याच बाल घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्यानं टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता. त्यानं सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते.त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता; कारण त्याला पगार मिळत होता.
परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कु-हाड कोसळली. तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले कि आजपासून हि खाण बंद झाली,आपलं काम सुटलं हि वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्यापुढे नाचू लागली.क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला. उद्या काय हा एकाच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला.
अंगातील कापडं काखेत दाबून भीमा घरी निघाला होता. तो एका ओढ्यावर थांबला. त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनःस्थितीत तो घराकडे फिरला.तो त्याची नजर एका राखेच्या ढिगा-यावर स्थिरावली. ती राख मढ्याची होती.जळकी हाडं सर्वत्र पसरली होती.त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला.एखादं बेकार असेल बिचारे, कंटाळूनच मेलं असेल.सुटलं असेल एकदाच - असं मनाला सांगू लागला. आपणही असेच मरणार! दोनच दिवसात उपासमार सुरु; मग नाबदा रडत बसेल.बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही.
इतक्यात त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं. तसा भीमा पुढे आला.त्याने वाकून, निरखून पाहिलं.तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती.ती चटकन उचलून भीमान करकरून मुठ दाबली.त्याला आनंद झाला. एक तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत, याचा त्याला हर्ष झाला.मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला.जगण्याचा नवा मार्ग सापडला.
आणि दुस-याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंदू लागला.नदी नाल्यातील मसनवटे तुडवू लागला. प्रेताची राख जमवून तो चाळणीन चाळू लागला. आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुदी, नथ,पुतळी,वाळा,असे काही न काही घेऊन रोज येऊ लागला.
भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरु होता. तो निर्भय होऊन राख चाळीत होता.अग्नीच्या दाबान प्रेताच्या अंगावरच सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला.जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी.कवट्या फोडी मनगट कुटी पण सोनं मिळवी.
संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबदा साठी खजूर घेई.त्याचा तो धंदा अखंड चालला होता.
भीमा प्रेताची राख चाळून जगत होता.त्यामुळे जगणे नि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते.ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मरावं तर श्रीमंताने आणि जगावं तर श्रीमंतान गरिबांन मारू नये असा त्याचा दावा होता.अवमानित पामराला जगण्याचा नि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजा-यांना दरडावून सांगत होता.जो मरतेसमयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो.असं त्याच मत होत.
बेकारीच्या उग्रतेन त्याला उग्र केलं होत.तो रात्रंदिवस मसणवटी धुंडाळीत होता.मढ हे त्याच्या जीवनच साधनं झालं होत.त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होत.
-->
त्याचं दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते.पुरलेली मढी बाहेर पडत होती. एका सावकाराच्या तरुण सुनेचे प्रेत स्मशानातून नदीवर येऊन पडले होते.आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते.अलीकडे मढी नदीपर्यंत कशी जातात त्याचं यांना नवल वाटत होत.कुणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खात पाळतीवर होत. पण मढ्यावर पाळत करणं तितकं सोपं नसतं.
सूर्य मावळला.सर्वत्र अंधार पसरला.भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं.तेव्हा तो गंभीर होऊन जेऊ लागला.आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली ,"आज कुठं जाणार वाटतं ?मला वाटतं हे काम नको आम्हाला.कुठंतरी दुसरं काम करा. मढ, मढ्याची राख , सोनं, संसार हे सारंच विपरीत आहे लोक नावं ठेवतात."
"तू बोलू नको ."तिचं बोलणं एकूण भिमाचं मन दुखावलं.तो चिडक्या स्वरात म्हणाला."मी काहीही करीन.त्याचं काय जातं? माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का?"
"तसं नव्हे -"नव-याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली,
"भुतासारखं हे हिंडणं चांगलं नाही.मला भीती वाटते म्हणून म्हणते."
"मसणवट्यात भुतं असतात असं तुला कोणी सांगितलं ?अग ,हि मुंबई एक भूतांचा बाजार आहे. खरी भुतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसणवट्यात कुजतात भूतांची पैदास गावात होते - रानात नाही." भीमा म्हणाला.
त्याचं हे बोलणं ऐकूण ती गप्प झाली आणि भीमान निघण्याची तयारी केली तू गुरकून म्हणाला, " मुंबई चाळून मला काम मिळालं नाही.पण मढ्याची राख चाळून सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला.पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते -" असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निःशब्द शांतता नांदत होती नि भीमा निघाला होता.
क्रमशः ...........
स्मशानातील सोनं - २
Next part open hot nahi
ReplyDeletehttps://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/phakiraa.pdf&ved=2ahUKEwi6yYqd2PvqAhVB_XMBHf83BwoQFjAAegQIBRAB&usg=AOvVaw0DFzxarydSF4Nl0Yg8KjY1&cshid=1596346217457
Delete👌
ReplyDelete