17 Feb 2018

लाडक्या लेकीस पत्र



प्रिय प्रांजल,
सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!. ..... ...   !!
खरंतर तुझ्या मागच्याच वाढदिवसाला तुला पत्र लिहिण्याचा मी विचार केला होता पण म्हणतात कुठल्याही गोष्टीची एक ठराविक वेळ यावी लागते अगदी तसंच .......
किती भराभर दिवस जातात नाही, आता काही दिवसापूर्वी मी तुला कुशीत घेऊन झोपायचे एवढीशी प्रांजल, किती भर्रकन मोठी झाली मला कळलंच नाही, कारण लेकरं मोठी होतात आई मोठी होत नाही.
खरं म्हणजे मी स्वतः खुप मोठी नाही पण तरीही जीवन यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्या मनाशी अशी खुणगाठ बांधावी लागते की यशस्वी झाल्यानंतर ती गाठ आपल्या मनाशी घर करुन असते की ,या निर्धारानेच मी यशस्वी आहे असे आपण म्हणत असतो पण, पण तत्पूर्वी ……….
हाच तो काळ आहे गरुडाचे पंख लावून आकाशात उंच उंच भरारी मारण्याचा , सळसळत्या रक्ताला आणि जीवनाला दिशा देण्याचा ,हाच तो कालखंड . जीवनाचे स्वप्न बघून त्या स्वप्नांना वास्तवात उतरवन्याचा हाच तो काळ आहे . स्पर्धेच्या मैदानात गुनवत्तेचा पराक्रम गाजवन्याचा जो ह्या पराक्रमात तरबेज त्याच्याच गळ्यात विजयाची लक्ष्मी हार घालते. विजयी व्हायचे असेल तर स्वप्नात मश्गुल राहून चालत नाही,जो स्वप्नात मश्गुल राहिला त्याच्या जीवनात शोकांतिका अटळ आहे.
आज स्पर्धेत टिकायाच असेल तर चिखलात फसून चालत नाही त्यासाठी आपल नाण आस बनवाव लागतं की ते चिखलात जरी पडलं तरी त्यान टन टन असा आवाज केला पाहिजे  तरच आपण उभे राहू शकतो अन्यथा …….जो पर्यंत वेळ आपल्या हातात आहे तो पर्यंत वेळ, निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय आयुष्यात काहीच नाही
बाळा माझ्या तुझ्या कडून खूप अपेक्षा आहेत तू मोठं व्हावंसं, तुझ्या पायावर उभं राहावसं, याची मुलगी, त्याची बहीण, त्याची बायको अशी नाही तर तुझी स्वतःची एक ओळख असावी,खरंतरं तुझ्या नावाने माझी ओळख होईल तो दिवस माझ्या साठी सोन्याचा दिवस असेल फक्त ती ओळख चांगली असावी एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि ती असेलंच अशी मला खात्री आहे. तुला एका कर्तृत्ववान, रुबाबदार,अधिकाऱ्याच्या रूपात बघण्याचं माझं तू जन्माला आल्या पासूनच स्वप्नं आहे
ज्या दिवसांपासून प्रभू सरांची आदिती लंडन ला  गेल्याचं कळलं त्या दिवसापासून माझी ऐपत नसतानाही मी तुला परदेशात शिकायला पाठवण्याचं स्वप्न बघतेय, पण हे साध्य होण्यासाठी माझा तुझ्यावर विश्वास असणं गरजेचं आहे तरच मी तुला इतक्या लांब एकटीला पाठवण्याची रिस्क घेऊ शकते नाहीतर काय खरंय....... इथून पुढच्या काळात तुला तो विश्वास आपल्यात निर्माण करायचा आहे तरच हे शक्य आहे.
विश्वासावर जग चालतं बाळा आणि कुठल्याही नात्यात विश्वास कमवायला सगळं आयुष्य पणाला लावावं लागतं आणि गमवायला एक क्षण पुरेसा असतो. प्रत्येक नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो, मग ते नातं नवरा बायकोचं असो किंवा मायलेकीचं. नातं कसं काचेसारखं पारदर्शक असावं, पारदर्शक म्हणजे एकमेकी पासून कुठलीही गोष्ट लपून राहता कामा नये. आपल्या माणसाची एखादी गोष्ट जेव्हा बाहेरच्या माणसाकडून कळते तेव्हा दोघीनांही खूप त्रास होतो,त्यापेक्षा जे काय असेल ते आपलं आपणंच सांगितलेलं कधीही चांगलं..... त्याने नात्यातला विश्वास घट्ट होतो.  
तुला माहितीये प्रांजल तू ज्या दिवशी जन्माला आली त्यादिवशी सगळ्यात जास्त आनंद मला झाला होता कारण ज्या गोष्टी एक मुलगी म्हणून मी करू शकले नाही ते सगळं मला तुझ्या रूपात पूर्ण करता येणार होतं
प्रांजल एका स्त्रीच शरीर हे तिला काचे सारखं जपावं लागतं, कारण काचेला एकदा गेलेला तडा हा कशानेही मिटत नाही अगदी शेवट पर्यंत तो तडा तसाच राहतो आणि प्रत्येक वेळी त्या चुकेची  आठवण करून देत राहतो, आणि बाळा पश्चाताप हि जगाच्या पाटीवर अशी विभूती आहे जी माणसाला जगूही देत नाही आणि मरू हि देत नाही. पण प्रांजल हे हि खरं आहे कि, स्त्रीच्या शरीराला तिच्या  इच्छे शिवाय कुणीही स्पर्श करू शकत नाही पण त्यासाठी ती स्वतः तेवढी स्ट्रॉंग असायला हवी
याचा अर्थ असा नाही कि मी तुला मुलांशी मैत्री करू देणार नाही बोलू देणार नाही, तसं नाही तू मुलांशी बोल मैत्री कर त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही फक्त तुझं मन सांभाळ, शरीर सांभाळ तुझ्या शरीराचा, मनाचा कुणाला गैर फायदा घेऊ देऊ नकोस, ह्या दोन गोष्टी जर तू संभाळल्यास तर तू जिंकलीस…....आयुष्याच्या वाटेवर तुला काही चांगले लोक भेटतील काही वाईटही भेटतील फक्त काय चांगलं काय वाईट हे जर वेळीच ओळखता आलं तर होणारे अपघात टाळता येतात... ते तू ओळखायला शिक..... माझं फक्त एवढंच सांगणं आहे, एखादं ध्येय मनाशी ठरवून त्याचा पाठलाग सुरु कर,आता पासून सुरवात करशील तरचं वेळेत पोहचू शकशील. आज पासून आपण आपल्यातल्या  मैत्रीच्या नात्याला नव्याने सुरवात करूया... आपलं नातं असं करूया कि इतरांनी आपल्या नात्याचा आदर्श घ्यावा. 
आयुष्याच्या वाटेवर मी सदैव तुझ्या सोबत आहे, तुझी आई म्हणून , मैत्रीण म्हणून तू जशी म्हणशील तशी मी तुझी सोबत करेल. जेव्हाही तुला अडचण असेल तू मला आवाज दे मी नक्कीच तुला समजून घेण्याचा आणि मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन....
जीवनात यशस्वी होण प्रत्येकाच्याच पदरात आहे असं नाही पण प्रयत्नवादी कधी अयशस्वी होत नाही म्हणूनच .................... गरुडाचे पंख घे भरारी मारण्यासाठी ,सूर्याचे तेज घे अंधाराच्या नाशासाठी, पर्वताचा निश्चय घे निर्णयावर ठाम राहण्यासाठी, फुलांचा सुवास घे दुखाःत सुद्धा हसण्यासाठी,काट्याची  धार घे अन्यायाच्या नाशासाठी, आभाळाचे विशाल सांधे चुका माफ करण्यासाठी, वार्याचा वेग घे प्रगती पथावर अग्रेस होण्यासाठी आणि माझ्याकडून शुभेच्या घे यशस्वी होण्यासाठी ....... यशस्वी होण्यासाठी ....... यशस्वी होण्यासाठी

                                                                   - तुझीच


No comments:

Post a Comment